Pune नेहमीच मुख्यमंत्री बदलाबाबतच्या चर्चा झडत असतात. तब्बल सहावेळा उपमुख्यमंत्री पद उपभोगलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होता न आल्याचं शल्य नेहमीच बोचत होतं.
ते त्यांनी वारंवार बोलूनही दाखवलं होतं. पण त्यांचं 28 जानेवारी 2026 अचानक अपघाती निधन झालं आणि ही चर्चा पूर्णपणे थांबली. पण अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत बसवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात जोरदार चर्चा सुरू झाली असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यानं खळबळजनक विधान केलं आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून पूर्ण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. तसेच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्रिपदावर पक्ष नेतृत्वाकडून निर्णय घेतला जाईल असे सांगत मोठ्या राजकारकीय बदलाचे संकेत दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या निधनानंतर मोठे बदल होताना दिसून येत आहे. सुनेत्रा पवार या एकाचवेळी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाची धुरा सांभाळत आहे. राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांशी चर्चा केली होती.
याचदरम्यान, सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात अशी तीव्र इच्छा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पुढे आणली जात आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रासह युतीचं राजकारण हादरवलं आहे.
संजय राऊत यांनी यावेळी हे एकाच निवडणुकीपुरतं आहे. पुढची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं सांगितलं. तसेच ही निवडणूक आम्ही अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पाहत आहोत. अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, जर सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर तो भाजपचा मोठेपणा असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस जर त्यांचा वारसदार म्हणून एकनाथ शिंदेऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय, असं मला जाणवत आहे, असेही त्यांनी म्हटले.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. सध्या सुनेत्रा पवार या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचार पवार कुटुंबाकडून करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
