Pune News: ‘इतके मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी..’, चंद्रकांत पाटील यांचं पुण्यातील भाषण प्रचंड चर्चेत

Pune महाराष्ट्रातील अनेक मराठा मुख्यमंत्री आपल्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत.मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी कायदा करून तो लागू केला,असं विधान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या फिरोदिया हॉलमध्ये आयोजित ‘देवा भाऊ’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

मराठा समाजाच्या प्रगतीसाठी फडणवीस अत्यंत संवेदनशील होते.आरक्षणाचा कायदा तयार करताना त्यांनी स्वतः प्रत्येक तरतुदीचा अभ्यास करून आवश्यक त्या सूचना दिल्या.त्यावेळी आपण मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख होतो आणि हा कायदा तयार करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली,असे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाचा कायदा राज्य सरकारने केला.मात्र तो सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही,असे सांगतानाच यासाठी आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोष देणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. कोविड 19 महामारीमुळे त्या काळात ठाकरे यांना दिल्लीला जाऊन प्रभावी पाठपुरावा करता आला नाही,असे पाटील यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीचाही उल्लेख केला.शेतकऱ्यांच्या पहिल्या कर्जमाफीबाबत देवेंद्र फडणवीस अत्यंत आग्रही होते.त्यांनी स्वतः बँकांमध्ये बसून कर्जदारांची माहिती घेतली आणि सूर्योदयापूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती,असा दावा चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात केला.