आयटी कंपनीचा भारतीय कर्मचाऱ्यांना कठोर इशारा;

Pune आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲक्सेंचरने आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे की, डेस्क आरक्षित न करता कार्यालयात हजर झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

हायब्रीड वर्कच्या युगात कंपन्या कार्यालयाच्या वापराबाबत पुनर्विचार करत असल्याने, कर्मचाऱ्यांची संख्या आणि कामासाठी उपलब्ध जागा यांच्यातील वाढती तफावत या निर्देशातून अधोरेखित होते.

१४ मार्च रोजीच्या एका अंतर्गत ईमेलमध्ये, कंपनीच्या ‘रिटर्न-टू-ऑफिस’ टीमने डेस्कचे आगाऊ आरक्षण करण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने ‘मिंट’च्या वृत्तानुसार, या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

“डेस्कचे निश्चित आरक्षण (सीट बुकिंग) नसताना कार्यालयात वारंवार येणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि त्यांच्यावर योग्य ती सुधारणात्मक कारवाई केली जाईल”, असे ॲक्सेंचर इंडियाच्या टीमने पाठवलेल्या एका अंतर्गत ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे, असे या ‘मिंट’च्या वृत्तात म्हटले आहे.

या कारवाईचे नेमके स्वरूप स्पष्ट करण्यात आले नसले, तरीही ही पावले इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक कठोर भूमिका दर्शवतात. वृत्तात उल्लेख केलेल्या ई-मेलनुसार, कार्यालयातील सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी, कर्मचाऱ्यांनी आता किमान एक दिवस आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या डेस्कचे आरक्षण करणे अनिवार्य आहे.

या धोरणाचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. “जर आमच्याकडे जागेचे (सीटचे) निश्चित आरक्षण नसेल, तर कार्यालयापर्यंत जाण्यासाठीच्या वाहतूक सुविधांचा लाभ घेणे आम्हाला शक्य होत नाही”, असे एका कर्मचाऱ्याने सांगितल्याचे या वृत्तात नमूद केले आहे.

हायब्रीड कार्यपद्धतीमुळे जागेची मर्यादा

ॲक्सेंचर सध्या कार्यालयात येण्याचे निश्चित दिवस नसलेल्या लवचिक हायब्रीड मॉडेलवर काम करते. पण, जागेच्या आरक्षणाची अट क्षमतेच्या आव्हानांकडे निर्देश करते, कारण कंपनी आपल्या जागेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत आहे.

कंपनीने आपल्या निवेदनात यामागील कारण स्पष्ट केले की, “आधीच डेस्क आरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे प्रभावी नियोजन आणि आमच्या कार्यालयाच्या क्षमतेचा योग्य वापर करणे शक्य होते.”

या क्षेत्रातील तज्ञांच्या मते, हे धोरण व्यापक खर्च-नियंत्रण प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. नफ्याच्या प्रमाणावर दबाव असल्याने, कंपन्या अतिरिक्त कार्यालयीन जागा कमी करत आहेत आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करत आहेत.