Government Scheme For Brahmin Community: तुम्ही ब्राह्मण असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी एक विशेष योजना लागू केली आहे.
विशेष म्हणजे ब्राह्मण समाजासाठी घोषित झालेली ही वैयक्तिक आर्थिक लाभाची पहिलीच योजना आहे. प्रतिवर्षी 50 लाभार्थीना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ मिळणार आहे 15 लाखापर्यंतच्या कर्जाचे आणि व्याजाचे हप्ते वेळेवर भरल्यास बँकेकडे भरलेल्या व्याजाची रक्कम देखील दरमहा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. नेमका कोणाला लाभ मिळणार? वाचा योजनेच्या अटी व निकष..
राज्यातील ब्राह्मण समाजासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक लाभ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी (EWS) असलेले 10 टक्के आरक्षण या योजनेत समाविष्ट नसून, राजपूत आणि आर्य वैश्य समुदायांसाठीही अशीच स्वतंत्र योजना लागू करण्यात आली आहे.
विधान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध समाजांसाठी महामंडळे निर्माण केली होती. परंतु प्रत्यक्षात या महामंडळांकडे कोणताही निधी नव्हता. दीर्घकाळ ही मंडळे केवळ कागदावरच अस्तित्वात होती. अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून ‘परशुराम महामंडळा’ला अध्यक्ष नेमण्यात आले आणि तिन्ही महामंडळांना 50 कोटी रुपये अधिकृत भांडवल म्हणून देण्यात आले.
हेही वाचा…
Malegaon Rape Case Update: वडिलांच्या भांडणाची 3 वर्षांच्या चिमुकलीला शिक्षा.. नराधमानं लैगिंक अत्याचारानंतर केली निर्घृण हत्या
कोणती आहेत ती तीन मंडळे?
- ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ
- राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप महामंडळ
- आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्याक आर्थिक महामंडळ
सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी उद्योग आणि व्यावसायिक कर्जावरील व्याज परतावा
राज्य शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार,तिन्ही समाजांतील तरुणांना स्वतः चा उद्योग उभारण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
योजनेअंतर्गत दरवर्षी 50 लाभार्थ्यांची होईल निवड
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना- 15 लाखांपर्यंत कर्ज
लाभार्थ्याला 15 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास लाभार्थ्याने भरलेले व्याज थेट त्याच्या बँक खात्यात महिन्यानुसार परत केले जाईल. जास्तीत जास्त 4.5 लाख परतावा रक्कम असेल.
गट कर्ज व्याज परतावा योजना – 50 लाखांपर्यंत कर्ज
गटाने घेतलेले कर्जाची रक्कम 50 लाख रुपयांपर्यंत असू शकते. कर्जाची नियमित फेड झाल्यास भरलेल्या व्याजाची परतफेड केली जाईल. कमाल परतावा रक्कम 15 लाख करण्यात आली आहे. नियमांनुसार, मासिक हप्ता भरल्याची माहिती 15 दिवसांच्या आत सादर न केल्यास त्या महिन्याच्या व्याजाचा लाभ दिला जाणार नाही.
हेही वाचा..
Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा मोठा परिणाम, सोनं 16 हजारांनी स्वस्त
दिव्यांग आणि महिलांसाठी विशेष आरक्षण
या योजनेत दिव्यांग आणि महिलांसाठी विशेष आरक्षण देण्यात आले आहे. 3 टक्के निधी दिव्यांगांसाठी तर 30 टक्के निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे . आरक्षणानुसार अर्जदार उपलब्ध नसल्यास निधी सर्वसाधारण गटाला दिला जाईल, अशी देखील तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्या प्रकारच्या उद्योगांना मिळू शकतो लाभ?
ही योजना महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही एकाच व्यवसाय/उद्योगासाठी घेतलेल्या कर्जावर लागू होईल. यात पारंपरिक व बिगरपारंपरिक व्यवसाय, लघु, मध्यम व गृहउद्योग, उत्पादन, विक्री व व्यापार, सेवा क्षेत्र, पर्यटन क्षेत्राचा समावेश आहे.
लाभार्थ्यांसाठी काय आहेत अटी व निकष?
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- वय 18 ते 45 वर्षे.
- कर्ज खाते आधारशी संलग्न असावे.
- वेब पोर्टलवर नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज अनिवार्य.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत असावे.
- दिव्यांगांसाठी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आवश्यक.
- अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
- कर्ज प्रकरण राष्ट्रीयकृत/खासगी/सहकारी बँकेतून मंजूर झालेले असावे.
- एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस एकदाच लाभ.
- कर्जफेड नियमित असणे आवश्यक.
- उद्योग सुरू असल्याचे दोन फोटो आणि पुरावे व्याज परतावा मागणीच्या वेळी अपलोड करणे आवश्यक.
- इतर सरकारी महामंडळातून समान लाभ घेतलेला नसावा.
- बँक खाता PFMS किंवा तत्सम प्रणालीशी सुसंगत असावा.
हेही वाचा…
Value For Money: मध्यमवर्गीयांसाठी होंडाची स्टायलिश स्कूटर, एकदम कमी किमतीत बाजारात येणार
कोणती कागदपत्रे आवश्यक?
- ब्राह्मण, राजपूत किंवा आर्य वैश्य समाजाचे प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- व्यवसायासाठी आवश्यक असल्यास प्राधिकरणाचे आदेश
- महाराष्ट्रातील रहिवासाचा पुरावा
- उद्योगाचे स्थान दर्शवणारा पुरावा
- बँक खात्याची माहिती (PAN संलग्न)
- कर्ज मंजुरीची प्रत
या योजनेचा फायदा कोणाला मिळणार..?
या आर्थिक लाभ योजनांमुळे संबंधित समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फायदा होणार आहे. तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळेल. व्याजाचा मोठा भार कमी होण्याचा फायदा होईल. महिलांना आणि दिव्यांगांना विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. उद्योजकतेला चालना मिळेल तर समाजाच्या आर्थिक प्रगतीला गती मिळणार आहे.
