pune झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरिया जंगलात सोमवारी संध्याकाळी एक भीषण एअर ॲम्बुलन्स दुर्घटना घडली.
अपघातात विमानातील सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने केवळ चतराच नव्हे, तर संपूर्ण झारखंड शोकसागरात बुडाले आहे. ज्या रुग्णाला वाचवण्यासाठी धडपड सुरू होती, त्या संजय कुमार यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही या अपघातात मृत्यू झाल्याने दोन मुले अनाथ झाली आहेत.
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ कोण?… क्लिक करून आपलं मत नोंदवा!
स्वत:च्याच हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत भाजले होते संजय
लातेहार जिल्हयातील चंदवा येथील रहिवासी असलेले ४१ वर्षीय संजय कुमार हे एक ढाबा चालवत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्याच ढाब्यावर झालेल्या एका दुर्दैवी अपघातात ते ६५ टक्क्यांहून अधिक भाजले होते. त्यांच्यावर रांची येथील देवकमल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. कुटुंबीयांनी मोठ्या आशेने एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था केली, पण हीच आशा त्यांच्या विनाशाचे कारण ठरली.
२३ व्या मिनिटाला घात झाला!
रेडबर्ड एअरवेजचे ‘बीचक्राफ्ट C90’ हे विमान सोमवारी संध्याकाळी ७:११ वाजता रांची विमानतळावरून दिल्लीसाठी झेपावले. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, उड्डाणानंतर बरोबर २३ मिनिटांनी म्हणजे ७:३४ वाजता कोलकाता एटीसीशी असलेला विमानाचा संपर्क अचानक तुटला. त्यानंतर काही वेळातच चतरा येथील सिमरियाच्या घनदाट जंगलात विमान कोसळल्याची बातमी आली. विमानाचा चक्काचूर झाला होता आणि सातही प्रवाशांचे प्राण गेले होते.
अख्खं घरं झालं उध्वस्त, दोन मुले अनाथ
या अपघाताने संजय कुमार यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. विमानात संजय यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्चना देवी आणि पुतण्या धीरू कुमार हे देखील होते. या तिघांच्याही मृत्यूमुळे संजय यांची दोन मुले, १७ वर्षांचा शुभम आणि १३ वर्षांचा शिवम आता पूर्णपणे अनाथ झाले आहेत. आई-वडील दोघेही आता परतणार नाहीत, ही बातमी समजताच चंदवा गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
मृतांमध्ये कोणाचा समावेश?
या भीषण दुर्घटनेत कॅप्टन विवेक विकास भगत (पायलट), कॅप्टन सवराजदीप सिंह (को-पायलट), डॉ. विकास कुमार गुप्ता, पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा, रुग्ण संजय कुमार, त्यांची पत्नी अर्चना देवी आणि अटेंडंट धीरू कुमार यांचा समावेश आहे. डॉक्टर विकास कुमार गुप्ता हे एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या कर्तव्यावर निघाले होते, पण नियतीने त्यांच्यावरही झडप घातली.
