पुणे प्रतिनिधी (Devendra Fadnavis) राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीला (MVA) घरघर लागली आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी महायुतीत आपले राजकीय भवितव्य शोधले आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आज (Annasaheb Dange) भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.
अण्णासाहेब डांगे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेलं नेतृत्व आहे. याआधी त्यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या शिफारसीवरुन मंत्रिपद मिळाले होते. परंतु,नंतरच्या काळात त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने डांगे यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
मी 20 मार्च 2022 रोजी पक्षाचा राजीनामा दिला होता. पक्षांत चुरस निर्माण झाली आहे. अटलजींनी नाव घेतलं. प्रमोद महाजन उत्तराधिकारी होतील आणि गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून माझ्यावर अन्याय झाल्याची भावना डांगे यांनी बोलून दाखवली. तिथून माझी पिळवणूक झाली. गोपीनाथ मुंडे माझे खूप जवळचे मित्र. पण तरीही नाईलाजाने मला पक्ष सोडावा लागला होता. यानंतर शरद पवार यांनी एकदा एका व्यक्तीला सांगितलं होतं की अण्णांसोबत आता माणसं राहिली नाहीत. या वाक्यामुळे मी पक्षात निष्क्रिय झालो होतो असे डांगे यावेळी म्हणाले.
अण्णासाहेब डांगे 1995 मध्ये युती सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्री होते. याच वेळी सांगलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. त्यांच्या कार्यकाळात सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांची संयुक्त महापालिका स्थापन झाली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर डांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु, डांगे पक्षात फारसे सक्रिय नव्हते.