मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीला लाभली नवी दिशा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या ‘माझं गाव माझी मायभूमी’ या शीर्षक गीताचे लोकार्पण केले. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीला दिशा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील 10 वर्षांत राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची यशस्वीता बघितली, तर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निदर्शनास येते. कुठलेही अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. ‘जलयुक्त शिवार अभियान’ हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसाक्षरता वाढून राज्य जलसंपन्न होण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र ‘रोल मॉडेल’ म्हणून आपल्या देशा पुढे आले. यासोबतच नरेगा 11 कलमी कार्यक्रम, मागेल त्याला शेततळे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे. ग्रामपंचायत डिजिटल व स्वयं अर्थपूर्ण असाव्यात, तसेच गावांचा पर्यावरणपूरक विकास करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामसभांना या अभियानात सहकार्य करण्यासाठी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांमध्ये समृद्धीची स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.