मुंबई Mumbai news मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन हे केवळ राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी धडपड सुरू आहे, असा गंभीर आरोप उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मंत्री पाटील आज पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरत आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी ठणकावले. मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला एसीबीसी व ई डब्ल्यूएस मधून आरक्षण दिले होते. परंतु मनोज जरांगे पाटील यांना ते मान्य नव्हते. त्यांना केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय आरक्षण हवे आहे. यासाठीच त्यांचे आंदोलन सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील जवळपास 58 लाख कुणबी नोंदी शोधून त्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. समाजाचे सर्व प्रश्न सोडवले असतानाही आता केवळ राजकीय आरक्षण मिळावे यासाठीच मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. इतक्यात तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांना भेटणार नाहीत. शिष्टमंडळ त्यांच्या शी चर्चा करेल.
चर्चा करून मार्ग निघाला तर चर्चा करणे योग्य होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजाचा विचार केला आहे. त्यांनी कधीच मराठा समाजाचा तिरस्कार केला नाही. जे जे करता येईल ते त्यांनी आतापर्यंत केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे. सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरू नये असे आवाहन ही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देतात याकडे आता लक्ष लागले आहे.
