भाजपने (BJP) सत्तेसाठी सारीच तत्व गुंडाळून ठेवलीत का?, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी काँग्रेसशी आघाडी करणाऱ्या भाजपने अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क ‘एमआयएम’सोबत (MIM) आघाडी केली
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत (Akot Election) अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. मात्र, 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळालं नाहीये. अकोटमध्ये 35 पैकी 33 जागांची निवडणूक झालीय. यात भाजपला 11 जागा मिळाल्यात.
अशातच आता अकोट नगरपालिकेत भाजपने आपल्या नेतृत्वात ‘अकोट विकास मंच’ स्थापन केलाय. या ‘अकोट विकास मंचा’त (Akot Vikas Manch) भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा एमआयएम भाजपचा मित्रपक्ष झालाय. याशिवाय या आघाडीत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी झालाय. कालच या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीये.
भाजपचे नगरसेवक रवि ठाकूर या नव्या आघाडीचे गटनेते असणारायेत. या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा ‘व्हिप’ पाळावा लागणारेय. 13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणारेय. या आघाडीचे आता सध्याच्या 33 सदस्य संख्येत 25 सदस्य झालेयेत. तर नगराध्यक्षा माया धुळे या 26 व्या सदस्य आहेत. अकोट नगरपालिकेत काँग्रेसचे 6 आणि वंचितचे 2 सदस्य विरोधी पक्षात असणारायेत.
अकोट नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांना भाजपच्या माया घुळे यांनी 5271 मतांनी पराभूत केले होते. अकोट नगरपालिकेत भाजपनंतर एमआयएमचे सर्वाधिक 5 नगरसेवक विजयी झालेयेत. विधानसभेत ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा नारा देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट ‘एमआयएम’शी आघाडी केल्याने ते विरोधकाच्या टिकेला कसे उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारेय.
