Pune मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे. आंदोलनाचा शुक्रवारचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी मुंबईत मराठा आंदोलकांची तारांबळ झाली.
कारण खाऊ गल्ल्या बंद होत्या, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद करण्यात आलेली होती, टॉयलेट्सला टाळे ठोकलेले होते. त्यामुळे सायंकाळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता.
मुंबईत मराठा समाजाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असा आरोप जरांगे पाटलांनी केला. त्यामुळे उद्या लासलवाग येथून ट्रक भरुन भाकरी येणार आहेत, असं त्यांनी जाहीर केलं. याचा आणखी परिणाम झाला आणि महाराष्ट्रभरून गाड्या भरुन मदत येऊ लागली आहे.
सोशल मीडियात लोक आजच्या मदतीबद्दल पोस्ट करीत आहेत. कुणी पाच हजार पाण्याच्या बॉटल्स देतंय तर कुणी भाकरी-चपात्या पाठवत आहेत. काहींनी फळं आणि खिचडीची सोय केलेली आहे. मुंबईतल्या मराठा बांधवांना काहीही कमी पडू नये, यासाठी खेड्यातला मराठा समाज प्रयत्न करीत आहे.
काय म्हणाले होते जरांगे पाटील?
”फडणवीस साहेब, आमच्या तिकडे सभा घ्यायला आल्यानंतर आम्ही अशीच वागणूक देतो का? कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तो मराठ्याचाच कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही असं वागणार असाल तर आम्हीही बदला घेऊ.. असले धंदे करु नका. आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण पाणी देतो, पण तुम्ही जाणीवपूर्वक हाल करीत आहात.” असा आरोप जरांगे पाटलांनी केला.
ते पुढे म्हणाले की, मी रस्ते रिकामे करा म्हटलो होतो.. पण मुंबईतून माघारी जा, असे गैरसमजाचे मेसेज फिरवले गेले. आमच्या पोरांना त्रास देण्याचं काम सुरु आहेत. आमची लोकं माजलेले नाहीत, त्यांचे कष्ट करुन कंबरडे मोडले. त्यामुळे आमच्या लेकरांना उपाशी मारु नकात. इथं आलेले आमचे सगेसोरे आहेत, तुमचेही महाराष्ट्रात सगेयोरे असतील, त्यामुळे तुमच्या बुद्धीत बदल करा.
