मुंबई प्रतिनिधी :: राज्यात मराठी भाषेचा वाद सुरु आहे. ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू तब्बल २० वर्षांनी मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्रित आले होते. राज्य सरकारने हिंदी भाषेचा जीआर मागे घेतला.
मनसेच्या मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादानंतर, १८ जुलै रोजी राज ठाकरे मिरा रोडमध्ये सभा घेणार आहेत. ही सभा केवळ आभार सभा नसून, आगामी संघर्षाची दिशा निश्चित करणारी ठरू शकते. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलतात, ते ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीकडे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी मिरा-भाईंदर भागात एका मिठाई विक्रेत्याने मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, ज्यावर मनसेने भाजपवर टीका करत हा मोर्चा मराठी माणसांना डिवचण्याचा कट असल्याचा आरोप केला होता.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ८ मार्चला झालेल्या मनसे मोर्चाने जनतेचा ओघ दाखवून दिला. त्यानंतर आता राज ठाकरे पुन्हा मैदानात उतरले असून १८ जुलैची सभा निर्णायक ठरणार असल्याचे संकेत आहेत.